Yavatmal Water Shortage Preparation : विदर्भात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा नियोजन आणि टँकरची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले.


यवतमाळ : विदर्भात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागांनी नियोजनबद्ध तयारी ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अधिकाऱ्यांना दिले.
👉 यवतमाळसह परिसरातील इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा : विदर्भ
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, विविध विभागांचे कार्यकारी अभियंते, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच नगरपालिकांचे मुख्याधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान ग्रामीण व शहरी भागातील सध्याची पाणीपुरवठा स्थिती, उपलब्ध जलसाठे, विहिरी व बोअरवेलची स्थिती तसेच संभाव्य टंचाईग्रस्त भागांचा आढावा घेण्यात आला. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची मागणी वाढत असल्याने नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळेल यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
👉 हे देखील वाचा : आरोग्य विमा क्लेम प्रक्रियेसाठी राज्यात नवी कार्यपद्धती
तसेच आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पाणीपुरवठा व्यवस्थेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांनाही आवाहन करताना पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. जलसंधारण उपक्रमांना प्राधान्य देत प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास संभाव्य पाणीटंचाई टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
👉 राज्यातील इतर जिल्ह्यांतील घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा : महाराष्ट्र


