Washimba Accident : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नविन बायपास वाय-पॉइंट नजीक राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील एक महिला व एक पुरुष यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून अन्य पाच प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.


बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नविन बायपास येथील वाय-पॉइंटजवळ राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारचे टायर अचानक फुटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील एक महिला व एक पुरुष अशा दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून अन्य पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.
या अपघातात खुशरंग भिलुजी मायवाड (वय ५०) आणि अनिता खुशरंग मायवाड (वय ४८, रा. बैतुल, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. तर मोनू मुरली हारोळे, शिवा मुरली हारोळे, रोहित खुशरंग मायवाड, बामी मायवाड यांच्यासह अन्य जखमींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथून बैतुल (मध्यप्रदेश)कडे परतताना एमपी ४८ झेडएच ४८२२ क्रमांकाच्या कारमधून एकूण सात प्रवासी प्रवास करत होते. वाशिंबा नविन बायपास वाय-पॉइंटजवळ कारच्या डाव्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे दहा फूट खोल दरीत जाऊन उलटली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कार पूर्णपणे पलटी झाली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेतात काम करत असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन देशमुख, गजानन तिडके, नितीन बोपुलकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रमोद डोईफोडे, किशोर सोलंके, शुभम फलके, ज्ञानेश्वर जामोदे यांनी घटनास्थळी पोहोचून पलटी झालेल्या कारमधून जखमींना बाहेर काढत त्यांना उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे व बोरगाव मंजू पोलिस करीत आहेत.


