Chhatrapati Shivaji Maharaj 400th Birth Anniversary 2030 : किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2030 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 400 वी जयंती जागतिक स्तरावर साजरी करण्याची घोषणा केली. गड-किल्ले संवर्धन, जागतिक वारसा दर्जा आणि राज्याच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा.


पुणे : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग असून त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरी येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.
👉 शिवाजी महाराज जयंतीशी संबंधित बातम्या वाचा: सांगलीत शिवजयंतीनिमित्त मेगा पदयात्रा; ‘जय शिवाजी’ घोषणांनी शहर शिवमय
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.


शिवरायांनी हिंदुस्थानाला दिली नवी दिशा : मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता, असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेक राजे मोगलांच्या आधिपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली.
१८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्य उभे करताना त्यांनी “हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे” ही भूमिका स्वीकारली. त्यांच्या राज्यात समता, न्याय, स्त्रीसुरक्षा आणि शेतकरीहिताला प्राधान्य होते, असेही त्यांनी सांगितले.
👉 महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा: महाराष्ट्र
शिवाजी महाराजांनी सुमारे ५० प्रकारचे कर रद्द करून सुटसुटीत करप्रणाली निर्माण केली, जलव्यवस्था व जंगल नियोजन केले तसेच समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यासाठी जलदुर्ग उभारले, असे त्यांनी स्पष्ट केले.


गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा
पंतप्रधानांच्या पुढाकाराने शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले असून २७ देशांनी त्यास मान्यता दिली. संबंधित प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारले. राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.


बलशाली महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आणि त्यांच्या विचारांवर चालत स्वाभिमानी व बलशाली महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार सरकारने केला आहे.
जलव्यवस्था, अर्थकारण आणि पर्यावरण संरक्षणाच्या संकल्पना महाराजांनी चारशे वर्षांपूर्वीच राबवल्या. राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन अधिक वेगाने केले जाईल. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त किल्ले स्वच्छता व जतन मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिवनेरी किल्ला प्रेरणास्थळ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला हे प्रेरणास्थळ होते. त्यांच्या पुढाकारातून ‘किल्ले शिवनेरी विकास आराखडा’ साकार झाला.
जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्पही करण्यात आला असून गडकोट संवर्धनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. रायगड विकास आराखडा, तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील स्मारकांची कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा
कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा सादर केला. पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजवली तसेच बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग सादर केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी आणि माँ जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची पालखी वाहिली.
‘शिवनेर भूषण’ पुरस्कार प्रदान
मुख्यमंत्री यांच्या हस्ते खालील मान्यवरांना ‘शिवनेर भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आले –
प्रगतशील शेतकरी स्व. पंकज वामन
टाटा कॅन्सर रुग्णालय, खारखर येथील विभाग प्रमुख डॉ. विनोद सीताराम हांडे
लेफ्टनंट अजिंक्य मेहेर
माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खैरे
उपलेफ्टनंट श्रुतिका ताथवडे
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
👉 राजकीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचा: राजकारण
शिवजन्मोत्सव सोहळा
२०३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती जागतिक स्तरावर साजरी होणार
शिवनेरीसह १२ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा
गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा शासनाचा निर्णय
किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविणार
‘शिवनेर भूषण’ पुरस्कारांचे वितरण
पारंपरिक पाळणा, पोलीस सलामी व सांस्कृतिक सादरीकरणाने सोहळा रंगला
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


