India Wins T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांच्या स्फोटक फलंदाजीसह बुमराह-अक्षरच्या गोलंदाजीने भारताचा ऐतिहासिक विजय.


अहमदाबाद : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक २०२६ वर नाव कोरले. या विजयासह टीम इंडियाने सलग दोन टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला. भारताने उभारलेल्या २५६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १५९ धावांवर गारद झाला.


भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा भक्कम डोंगर उभारला. या डावात सलामीवीर संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.
𝗥𝗘𝗖𝗢𝗥𝗗-𝗕𝗥𝗘𝗔𝗞𝗜𝗡𝗚 𝗦𝗧𝗔𝗡𝗗 👏
This is also the first 5️⃣0️⃣-plus opening stand in an ICC Men’s #T20WorldCup #Final 🔥
Sanju Samson 🤝 Abhishek Sharma
Updates ▶️ https://t.co/5LXBod8bl1#TeamIndia | #MenInBlue | #INDvNZ | @IamSanjuSamson | @OfficialAbhi04 pic.twitter.com/CgO0aIMsKW
— BCCI (@BCCI) March 8, 2026
सॅमसन, अभिषेक आणि ईशानची तुफानी फलंदाजी
संजू सॅमसनने सलग तिसऱ्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावत ४६ चेंडूंमध्ये ८९ धावांची शानदार खेळी केली. त्याने ५ चौकार आणि ८ षटकार ठोकले. सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी, तर सॅमसन आणि ईशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली.


अभिषेक शर्माने २१ चेंडूंमध्ये ५२ धावा, तर ईशान किशनने २५ चेंडूंमध्ये ५४ धावा करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनीही आक्रमक फटकेबाजी करत भारताला २५५ धावांपर्यंत पोहोचवले. दरम्यान, जेम्स नीशामने १६व्या षटकात तीन विकेट घेत भारतीय डावाला काहीसा ब्रेक दिला.
बुमराह-अक्षरच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा शरणागती
२५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवातच खराब झाली. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी अचूक मारा करत किवी फलंदाजांना मोठी भागीदारी करू दिली नाही.
नियमित अंतराने विकेट्स घेत भारताने सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले. दबावाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही आणि संपूर्ण संघ १५९ धावांवर बाद झाला.
या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकत क्रिकेटविश्वात आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला. हा विजय भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा आणि इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा क्षण ठरला.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


