Chikhli Fire Incident : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील जयस्तंभ चौकात भीषण आग लागून ५ ते ६ दुकाने जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती; सुदैवाने जीवितहानी टळली.


चिखली (जि. बुलढाणा) : शहरातील मध्यवर्ती भागातील जयस्तंभ चौक परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या आगीत परिसरातील सुमारे ५ ते ६ दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जयस्तंभ चौकातील मोबाईलचे दुकान, भेल सेंटर, बागवानांचे फळांचे दुकान, एक घड्याळाचे दुकान तसेच काही लहान व्यावसायिकांची दुकाने या आगीच्या भक्षस्थानी पडली.
आग लागल्यानंतर काही वेळातच परिसरात धुराचे मोठे लोट पसरले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
विशेष म्हणजे, घटनास्थळापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर पेट्रोल पंप असल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
हे देखील वाचा
👉 अकोल्यात दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली
👉 बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील बातम्या वाचा : विदर्भ


