Akola heatwave 46.9 temperature Vidarbha : अकोल्यात ४६.९ अंश तापमानाची नोंद; विदर्भातील अनेक शहरांत उष्णतेची लाट तीव्र. प्रशासनाकडून हीट वेव्ह अलर्ट आणि नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन.


अकोला : जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट अधिकच भडकली असून तापमानाने नव्या उंची गाठली आहे. रविवारी अकोल्यात तब्बल ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असून दुपारच्या सुमारास परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे.
👉 हे देखील वाचा : अकोला 44°C सह जगात दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर; राज्यात हीटवेव्ह, सरकारचा सतर्क
नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार २५ ते २७ एप्रिलदरम्यान हीट वेव्हचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ नोंदवली जात आहे. अकोल्यासह संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे.
विदर्भातील तापमानाचा आढावा
जिल्हा – तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अमरावती – ४६.८
वर्धा – ४६.४
यवतमाळ – ४६.०
नागपूर – ४५.४
चंद्रपूर – ४५.०
बुलडाणा – ४३.५
भंडारा – ४४.०
गोंदिया – ४४.४
गडचिरोली – ४४.६
आरोग्यावर परिणाम; उष्माघाताच्या घटनांत वाढ
वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चक्कर येणे, डोकेदुखी, अशक्तपणा आणि सतत घाम येणे अशी लक्षणे दिसत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला असून बाधित रुग्णांवर तातडीने उपचार केले जात आहेत.
👉 हे देखील वाचा : मान्सून २०२६ अंदाज: देशात ९२ टक्के पावसाची शक्यता; एल निनोचा परिणाम कमी
लहान मुले व पाळीव प्राण्यांची विशेष काळजी
प्रशासनाने लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद वाहनांमध्ये ठेवू नये, असा इशारा दिला आहे. शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी नियमित पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उष्णतेपासून बचावासाठी उपाय
दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. जड शारीरिक कामे करू नयेत, वाहनांचा वापर मर्यादित ठेवावा. भरपूर पाणी प्यावे, हलके कपडे परिधान करावेत आणि थेट उन्हात जाणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इतिहासाच्या दिशेने वाटचाल
अकोला हे विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक मानले जाते. २२ मे १९४७ रोजी येथे ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची विक्रमी नोंद झाली होती. यंदाच्या एप्रिलमध्ये ४६.९ अंश तापमानाची नोंद होताच पुन्हा एकदा त्या उच्चांकाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस तापमानात दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


