Vasmat mysterious tremors Hingoli : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पुन्हा एकदा जमिनीला धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महिन्यात चौथ्यांदा अशी घटना घडली असून भूकंपाची अधिकृत नोंद नाही.


वसमत (हिंगोली) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले भूगर्भातील रहस्यमय आवाज आणि धक्के आता नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. सोमवारी (२७ एप्रिल) रात्री सुमारे ११.३५ वाजता पुन्हा एकदा जोरदार धक्का जाणवल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. विशेष म्हणजे, या घटनेची अधिकृत भूकंप म्हणून नोंद झालेली नसल्याने या प्रकारामागील कारणांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
👉 हे देखील वाचा : देशभर उष्णतेची लाट कायम; IMDचा इशारा, पुढील काही दिवसांत पाऊस व हवामान बदलाची शक्यता
रात्रीच्या सुमारास अचानक धक्के; नागरिक घराबाहेर
सोमवारी उशिरा रात्री अचानक मोठा आवाज आणि जमिनीला बसलेला धक्का यामुळे पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, शिरळी आणि खांबाळा या गावांतील नागरिकांची झोप उडाली. अनेकांनी घाबरून घराबाहेर धाव घेत मोकळ्या जागेत आश्रय घेतला. काही ठिकाणी नागरिकांनी संपूर्ण रात्र जागूनच काढल्याचे समजते.
एप्रिल महिन्यातील चौथी घटना; ‘नोंद नाही’ हीच मोठी चिंता
वसमत तालुक्यासाठी एप्रिल महिना भूकंपीय हालचालींच्या दृष्टीने अस्वस्थ करणारा ठरत आहे.
११ एप्रिल रोजी पहिला मोठा धक्का बसला होता.
त्याच दिवशी दुसरा किरकोळ धक्का बसला होता.
२२ एप्रिल रोजी दुपारी तिसरा हादरा बसला होता.
आणि आता २७ एप्रिल रोजी रात्री चौथी घटना घडली.
या सर्व घटनांची अधिकृत भूकंप म्हणून नोंद न झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ आणि भीती अधिक वाढत आहे.
👉 हे देखील वाचा : मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; २०-३० मिनिटांची बचत, टोल वाढ नाही
७-८ वर्षांपासून धक्क्यांची मालिका
स्थानिकांच्या मते, वसमतसह औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यांत गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारचे धक्के अधूनमधून जाणवत आहेत. विशेषतः पांगरा शिंदे परिसरातील नागरिकांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत हे धक्के भविष्यातील मोठ्या संकटाची सूचना तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तातडीची पाहणी करण्याची मागणी
सतत होत असलेल्या या घटनांमुळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे भूगर्भशास्त्रज्ञांकडून सखोल तपासणीची मागणी केली आहे. तसेच जमिनीतील हालचालींचा वैज्ञानिक अभ्यास करुन स्थानिक नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे. ॉविशेषतः रात्रीच्या वेळी होणाऱ्या धक्क्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रश्न अजूनही अनुत्तरित…
भूकंपाची अधिकृत नोंद नसताना जाणवणारे हे धक्के नेमके कशामुळे होत आहेत? नैसर्गिक भूगर्भीय हालचाली की इतर काही कारण? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत वसमत तालुक्यातील नागरिक मात्र भीती आणि अनिश्चिततेतच दिवस काढत आहेत.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


