Kalyan Ahmednagar Highway Accident : कल्याण–अहिल्यानगर महामार्गावरील गोविली जवळ ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक. ११ प्रवाशांचा मृत्यू, २ जण गंभीर जखमी; ओव्हरटेकदरम्यान अपघाताची शक्यता.


मुंबई : कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी (१३ एप्रिल) सकाळी झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
👉 राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींसाठीवाचा – महाराष्ट्र
प्राथमिक माहितीनुसार, कल्याण–नगर मार्गावरील गोविली गावाजवळील रायता पुलावर सकाळी सुमारे १०.४५ वाजताच्या सुमारास ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की ईको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही
अपघाताच्या वेळी कारमध्ये चालकासह ११ ते १२ प्रवासी प्रवास करत होते. धडक इतकी भीषण होती की, कारमधील ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
कल्याण-मुरबाड मार्गावरील प्रवासी वाहतूक
अपघातग्रस्त ईको कार ही कल्याण ते मुरबाड दरम्यान प्रवासी वाहतूक करत होती. सोमवारी सकाळी ती प्रवासी घेऊन कल्याणहून मुरबाडकडे जात असताना हा अपघात घडला.
ओव्हरटेक करताना अपघाताची शक्यता
मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने कारला धडक दिली. प्राथमिक अंदाजानुसार, ओव्हरटेक करताना हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
👉 देशातील महत्त्वाच्या घडामोडींसाठीवाचा – भारत
स्थानिकांची मदत; पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने महामार्ग पोलीस आणि टिटवाळा पोलिसांना कळविले. पोलिस आणि मदत पथकांनी घटनास्थळी पोहोचून कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढले.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


