Maharashtra MLC election Bachchu Kadu entry : विधान परिषद निवडणुकीत बच्चू कडूंचा शिंदेसेनेत प्रवेश करून उमेदवारी. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींची निवड; अकोल्यात अमोल मिटकरी तर बुलढाण्यात सानंदा आणि काझी यांची नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा स्थानिक पातळीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिंदेसेनेत प्रवेश करताच त्यांना उमेदवारी मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली असून, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
👉 हे देखील वाचा : महाराष्ट्रात ५० लाख मतदार नावे संशयास्पद? किरीट सोमय्यांचा दावा | SIR मोहीम
बच्चू कडूंची एन्ट्री : थेट उमेदवारी
प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शिवसेनेत (शिंदेसेन) प्रवेश केला आणि लगेचच विधान परिषदेची उमेदवारी मिळवली. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रवेश केला असून, यामुळे राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की,
“शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत राहू आणि या लढ्यात कधीही माघार घेणार नाही.”
शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही हाती धनुष्यबाण घेतला आहे. त्यांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत राहणार असून, या लढ्यात कधीही मागे हटणार नाही. pic.twitter.com/5wnIuRgNSv
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) April 30, 2026
राष्ट्रवादीत झिशान सिद्दीकींना संधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या जागेसाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न केले होते. मात्र, अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांना पुन्हा संधी न मिळाल्याने त्यांनी सूचक पोस्ट करत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


अकोल्यात मिटकरींची नाराजी
कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही पुन्हा संधी न मिळाल्याने अमोल मिटकरी नाराज असल्याची चर्चा. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि ज्येष्ठ नेते नाझेर काझी यांनीही उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. काझी यांनी तर जिल्ह्यातील शिष्टमंडळासह बारामती दौरा देखील केला होता. तरीही या दोघांनाही संधी न मिळाल्याने स्थानिक पातळीवर नाराजीचे वातावरण आहे.
👉 हे देखील वाचा : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद; आमदार गायकवाडांवर आरोप, बुलढाण्यात सामूहिक वाचन
बुलढाण्यात स्थानिकांना पुन्हा डावलले?
सानंदा आणि काझी यांना तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; स्थानिक नेतृत्वाला संधी न मिळाल्याची भावना. दरम्यान, विधान परिषदेच्या १० जागांसाठी १०च उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, उमेदवारी वाटपामुळे अनेक ठिकाणी नाराजीचा सूर उमटत असल्याचे चित्र आहे.
एकूणच, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असली तरी स्थानिक नेत्यांना डावलल्याच्या भावनेमुळे राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.
— प्रतिनिधी महालोकवार्ता


