Shyam Manav allegation on Devendra Fadnavis : बुलढाणा दौऱ्यात अनिसचे श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत अंधश्रद्धा आणि ‘खरात’ प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं. वाचा सविस्तर बातमी.


बुलढाणा : राज्यात ‘खरात’ प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) आपल्या प्रचार मोहिमेला वेग देत आहे. या पार्श्वभूमीवर आज (२० एप्रिल) अनिसचे नेते श्याम मानव बुलढाणा दौऱ्यावर असून, त्यांनी पत्रकार परिषदेत काही गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
👉 हे देखील वाचा : Reel बनवताना बसचा भीषण अपघात; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी
शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधताना श्याम मानव यांनी अंधश्रद्धा, जादूटोणा आणि भोंदूगिरीविरोधात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी त्यांनी आपल्या अनुभवातील एक खळबळजनक प्रसंग सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले.
श्याम मानव म्हणाले की, २०१३ मध्ये अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला आणि त्यानंतर २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस प्रथमच मुख्यमंत्री झाले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली होती. त्या काळात ‘अनिस’च्या कार्यासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी त्यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता.
“सुरुवातीला सहकार्याची भूमिका दाखवण्यात आली, मात्र प्रत्यक्षात आवश्यक त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. मी अनेक वेळा भेटी घेतल्या, पण मला केवळ झुलवत ठेवण्यात आले,” असा आरोप श्याम मानव यांनी केला.
काँग्रेसच्या काळात अडथडे आले नाहीत!
त्यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात अडथळे आले नाहीत, मात्र नंतरच्या काळात अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. तसेच एका प्रकरणात भाजपच्या नगरसेवकाने हस्तक्षेप केल्याचाही दावा त्यांनी केला.
श्याम मानव यांनी आणखी एक गंभीर आरोप करत म्हटले की, अंधश्रद्धेला अप्रत्यक्षपणे चालना मिळाल्यामुळेच ‘खरात’सारखी प्रकरणे घडत आहेत. दरम्यान, या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, या विषयावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
👉 हे देखील वाचा : भेंडवळ घटमांडणी 2026: अतिवृष्टी, पूर आणि पिकांची नासाडीचा इशारा; अर्थव्यवस्थेलाही फटका?


