Medshi bypass accident 10 women injured : मेडशी बायपासवर भीषण अपघातात १० महिला मजूर गंभीर जखमी. भरधाव टाटा हॅरियरने उभ्या मॅक्झिमोला धडक दिल्याने कार उलटली; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको.


मेडशी : वाशिम-अकोला महामार्गावरील मेडशी बायपासजवळ गुरुवारी सकाळी सुमारे ७ वाजता झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा हॅरियर (GJ-19-BJ-2000) या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मॅक्झिमो (MH-08-AG-0967) वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात हळद काढणीच्या कामासाठी निघालेल्या १० महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत.
👉 हे देखील वाचा : समृद्धी महामार्गावर टायर फुटून स्कार्पिओ पलटी; कारंजा जवळ पाच जण जखमी
काय घडलं नेमकं?
मेडशी येथील महिला मजूर रिधोरा येथे कामासाठी जाण्यासाठी मॅक्झिमो वाहनात बसून होत्या. वाहन रस्त्याच्या कडेला उभे असतानाच वाशिमकडून अकोल्याकडे येणाऱ्या भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यावर उलटली, तर मॅक्झिमो वाहनाचा मोठा चक्काचूर झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलांना बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे वाशिम व अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिला या सर्व मेडशी गावातील रहिवासी असून रोजंदारीसाठी जात असताना त्यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.


जखमींची स्थिती कशी?
१० महिला मजूर गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मेडशी बायपासवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
👉 हे देखील वाचा : वाशिम भीषण अपघात: लग्नासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
‘ब्लॅक स्पॉट’ ठरत असलेला मेडशी बायपास
अकोला-नांदेड महामार्गावरील या बायपासवर रस्त्याच्या नियोजनातील त्रुटींमुळे वारंवार अपघात होत आहेत. पूल, संकेतचिन्हे आणि इतर सुरक्षाव्यवस्थांचा अभाव असल्याने नागरिकांना धोका पत्करून प्रवास करावा लागतो. याआधीही येथे अनेक गंभीर अपघात झाले आहेत.
या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी अकोला-नांदेड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.


रास्ता रोको : नागरिकांचा इशारा
“जोपर्यंत बायपासवर गतिरोधक, संकेतचिन्हे आणि इतर सुरक्षाव्यवस्था बसविल्या जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा ठाम इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.
दरवेळी अपघातानंतरच प्रशासन जागं होणार का?
मेडशी बायपासवरील अपघात रोखण्यासाठी आता ठोस आणि तातडीच्या उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
— प्रतिनिधी महालोकवार्ता


