washim accident family death : वाशिम जिल्ह्यातील पार्डी टकमोर फाट्याजवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. लग्नासाठी निघालेल्या लांभाडे कुटुंबावर काळाचा घाला.


वाशिम : नातेवाईकांच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी उत्साहात घरातून निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मंगरुळपीर–वाशिम रोडवरील पार्डी टकमोर (बिटोडा तेली) फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
👉 हे देखील वाचा : निंभा गावात अघोरी उपचाराचा व्हिडिओ व्हायरल, चेतन महाराज अडचणीत
मिळालेल्या माहितीनुसार, वारा जहागीर येथील रहिवासी संतोष बबन लांभाडे (वय ४२), पत्नी कलावती संतोष लांभाडे (वय ३५) आणि मुलगा ईश्वर संतोष लांभाडे (वय १२) हे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी तांदळी शेवई येथे जात होते. उद्या सकाळी होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी ते आनंदाने प्रवास करत असताना, नियतीने वेगळाच घाव घातला.
सायंकाळी सुमारे ५.३० ते ५.४५ वाजताच्या दरम्यान, पार्डी टकमोर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या आंब्याने भरलेल्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेल्याची माहिती आहे.
👉 हे देखील वाचा : जीगाव प्रकल्पातून अकोल्याला मिळणार पाणी; दीड वर्षात १३ नवीन टाक्यांची उभारणी
धडक इतकी तीव्र की तिघांचाही जागीच मृत्यू
अपघातात संतोष लांभाडे, पत्नी कलावती आणि मुलगा ईश्वर या तिघांनाही गंभीर दुखापत झाली. उपचाराची संधी मिळण्यापूर्वीच तिघांचाही जागीच मृत्यू झाला. काही वेळापूर्वी लग्नाच्या आनंदात घराबाहेर पडलेले हे कुटुंब क्षणात काळाच्या पडद्याआड गेले.
आनंदाचा क्षण शोकात बदलला
लग्नाच्या तयारीत असलेल्या नातेवाईकांवर या घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षणात आनंदाचे वातावरण शोकात परिवर्तित झाले. प्रत्यक्षदर्शींनीही हा भीषण अपघात पाहून हळहळ व्यक्त केली असून, घटनेचे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


