Murtijapur cowshed fire Sirso village : मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गावात गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले. जनावरे वेळेत सोडल्याने जीवितहानी टळली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.


मूर्तिजापूर : तालुक्यातील सिरसो गावात सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास एका गोठ्याला भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली. आग इतकी तीव्र होती की काही क्षणांतच गोठ्यातील साहित्य जळून खाक झाले. मात्र वेळीच सतर्कता दाखवत गोठ्यातील जनावरे बाहेर सोडल्याने मोठी जीवितहानी टळली.
👉 हे देखील वाचा : तेल्हारा बंद | गोवंश हत्याविरोधात भव्य मोर्चा; ‘गोमाता सन्मान दिन’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
क्षणात भडकली आग; गावकऱ्यांची धावपळ
प्राथमिक माहितीनुसार, शेतातील गव्हाच्या कापणीनंतर उरलेला कचरा जाळल्याने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आग वेगाने पसरत गोठ्यापर्यंत पोहोचली आणि काही वेळातच संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात सापडला.
लाखोंचे नुकसान; घराजवळील साहित्य जळाले
या घटनेत सहदेव चिंचोळकर, गजानन मालधुरे आणि विनायक मालधुरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोठ्यातील लाकडी साहित्य, शेतीसाठी वापरात असलेली उपकरणे तसेच घराच्या परसात ठेवलेले साहित्य आणि वाळत घातलेले कपडे पूर्णतः जळून खाक झाले.
अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात
आग लागल्याचे समजताच गावकऱ्यांनी तत्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. यानंतर मूर्तिजापूर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. थोडा विलंब झाला असता तर नुकसान अधिक वाढले असते.
👉 हे देखील वाचा : वाशिममध्ये 1300+ कृषी सेवा केंद्रांचा बंद; खरीप हंगामात शेतकरी अडचणीत
प्रशासनाची घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी अनिल ओईंबे आणि तलाठी पुरुषोत्तम महल्ले घटनास्थळी दाखल झाले. तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांनीही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
जीवितहानी टळली; सावधगिरीची गरज
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उन्हाळ्यात शेतीतील कचरा जाळताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


