Washim agriculture shops strike : वाशिम जिल्ह्यात 1325 कृषी सेवा केंद्रांचा अनिश्चितकालीन बंद सुरू. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशके मिळण्यात अडचणी; शासनाकडे विविध मागण्या प्रलंबित.


वाशिम : जिल्ह्यात आजपासून १३०० हून अधिक कृषी सेवा केंद्रांनी अनिश्चितकालीन बंद पुकारला असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाशिम जिल्हा कृषी व्यावसायिक संघाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील तब्बल १३२५ कृषी सेवा केंद्रांनी या आंदोलनात सहभागी होत दुकाने कडकडीत बंद ठेवली आहेत.
👉 हे देखील वाचा : तेल्हारा बंद | गोवंश हत्याविरोधात भव्य मोर्चा; ‘गोमाता सन्मान दिन’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
१३२५ केंद्रांचा एकत्रित बंद; पुरवठा पूर्ण ठप्प
जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कृषी सेवा केंद्रांनी एकत्रितपणे बंद पाळल्यामुळे बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. खरीप हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावरच हा बंद झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
विक्रेत्यांचा आरोप; ‘लिंकिंग’मुळे वाढतो ताण
कृषी सेवा केंद्र चालकांचा आरोप आहे की, रासायनिक खत कंपन्या ‘लिंकिंग’च्या माध्यमातून आवश्यक नसलेला अतिरिक्त माल खरेदी करण्यास भाग पाडतात. यामुळे त्यांच्यावर आर्थिक तसेच मानसिक ताण वाढतो. तसेच दोषी बियाणे किंवा खतांच्या प्रकरणात विक्रेत्यांनाच जबाबदार धरण्यात येते, यालाही त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
मुख्य मागण्या काय?
कृषी व्यावसायिक संघाने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.
प्रमाणित बियाण्यांसाठी सोपी पोर्टल व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, खतांचा पुरवठा सुलभ करावा, विक्रीवरील मार्जिन वाढवावे तसेच विक्रेत्यांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
👉 हे देखील वाचा : समृद्धी महामार्गावर टायर फुटून स्कार्पिओ पलटी; कारंजा जवळ पाच जण जखमी
शेतकऱ्यांची गैरसोय; रिकाम्या हाताने परतावे लागत आहे
खरीप हंगामाच्या तयारीसाठी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना दुकाने बंद असल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून त्यांच्या पेरणीच्या तयारीवर परिणाम होत आहे.
शासनाला इशारा; आंदोलन तीव्र करण्याची भूमिका
शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा कृषी व्यावसायिक संघाने दिला आहे.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


